वर्धा : गावात स्वयंपाकासाठी लागणाऱ्या पिठाला आटा चक्कीमधून दळून आणलं जातं. पण हेच दळण गावकऱ्यांना वर्षभर मोफत मिळत असेल तर पर्वणीच म्हणावी लागेल. गावाला निशुल्क दळण दळून मिळण्याची ही संधी मनसावळी या वर्धा जिल्ह्यातील ग्राम पंचायतीमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. गावकऱ्यांना मोफत दळण दळून जर पाहिजे असेल तर मात्र ग्राम पंचायतीला शंभर टक्के कर भरणा करणे अत्यावश्यक आहे. या अटीवरच गावात ग्राम पंचायतने पुढाकार घेऊन उभारलेल्या आटा चक्कीवर मोफत दळण दिले जात आहे. गावाच्या विकासासाठी आवश्यक असणारा निधी कर रुपात उभा केला जातो पण अलीकडे कर भरण्याची प्रवृत्ती कमी झाल्याने मनसावळी ग्राम पंचायतीने शंभर टक्के कर भरा आणि वर्षभर मोफत दळण दळून घ्या ! ही संकल्पना सुरू केली आहे.


राळेगाव – हिंगणघाट मार्गावर असलेले मनसावळी हे गाव हिंगणघाट तालुक्यात येते. १२०० लोकसंख्या असलेल्या या गावात गेल्या काही वर्षात कर वसुली ही कमी प्रमाणात होती. कर भरायला मागेपुढे पाहणाऱ्या अनेकांनी गेली सात – आठ वर्षे कराचा भरणा केला नसल्याची उदाहरणे या गावात होती. ग्राम पंचायतीचे आर्थिक उत्पन्नाचे साधन असलेल्या कर वसुलीसाठी कर्मचारी घरोघरी पोहचले तरी प्रतिसाद मिळत नसल्याचा अनुभव मनसावळी ग्राम पंचयातचे कर्मचारी गजानन हिवसे यांनी सांगितला. त्यामुळे येथील सरपंच सौ. प्रांजली मुकेश भोयर यांनी कर वसुली व्हावी या हेतूने गावात कर देणाऱ्यांना मोफत दळण देण्याचा निश्चय केला. याला ग्रामसेविका दीपिका धोपटे यांची साथ मिळाली. ग्राम पंचायतच्या 15 व्या वित्त आयोगाच्या निधी आणि विशेष फंडातून आटा चक्की खरेदी करण्यात आली. आटोमॅटिक पद्धतीने चालणारी ही आटाचक्की नागरिकांना देखील चालविणे सोपे झाले. गहू टाका, बटन दाबा आणि दळण दळून घेऊन जा असाच उपक्रम सुरू झाला. पण हे होत असताना मात्र नागरिकाने कर भरला आहे की नाही याची खातरजमा केली जात आहे.

आटा चक्की सुरू झाल्यावर मात्र ग्राम पंचायत समोर एक प्रश्न निर्माण झाला आहे. तो म्हणजे विजबिल भरण्याचा त्यासाठी तरतूद करून ठेवण्यात आली आहे. थ्री फेजचे मीटर येथे बसविण्यात आले आहे . पुढे देखभाल दुरुस्ती साठी देखील तरतुद केली जाणार आहे. वीज बिल भरण्यासाठी पैसे उपलब्ध जर झाले नाही तर सरपंच आणि सदस्यांच्या तीन महिन्यांच्या मानधनातून आम्ही विजेचे बिल भरू अशी तयारी असल्याचे सरपंचा प्रांजली मुकेश भोयर यांनी संगीतले आहे.

ग्राम पंचायतीच्या या संकल्पनेचा गावाला फायदा देखील व्हायला लागला आहे. नागरिक आपला घर व पाण्याचा टॅक्स भरून आपली जबाबदारी पूर्ण करीत आहे. घर कराची पावती आटा चक्कीवर दाखवायची आणि आपले गहू, ज्वारी, बाजरी, डाळ आदी धान्य दळून न्यायचे, असाच नित्यनियम गावकरी पाळताना दिसत आहे. ग्राम पंचायतीच्या सरपंच प्रांजली भोयर यांच्या प्रयत्नातून सुरू झालेल्या या प्रयोगाने कर गोळा होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. 1200 लोकसंख्या असलेल्या मनसावळी या गावात 2021-22 मध्ये 1 लाख 50 हजार इतकी कर वसुली झाली होती, तर 2022-23 मध्ये 1 लाख 90 हजार इतकी कराची वसुली झाली आहे. कर भरण्यासाठी नागरिकांचा कल वाढला आहे. हिंगणघाट – राळेगाव रस्त्यावर असलेल्या ग्राम पंचायत कार्यालयात उभारण्यात आलेल्या आटा चक्कीतील मोफत दळण योजनेचा रस्त्यावरून दिसणारा आकर्षक बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.


