दोन एप्रिल रोजी अमर काळे भरणार उमेदवारी अर्ज
का निवडली दोन एप्रिल उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख?
वर्धा : स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी.. ही म्हण सर्वच मानव प्राण्याला लागू आहे. देशात आईचा आशीर्वाद घेत येत्या लोकशाहीच्या उत्सवात अनेक उमेदवारांनी आपले नामांकन दाखल केले आहे. आईचा आशीर्वाद घेत अमर काळे हे देखील उमेदवारी अर्ज भरू शकतात… त्यासाठीच दोन एप्रिल ही तारीख त्यांच्यासाठी योग्य मानली जात आहे.
आर्वी येथील काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांना उमेदवारी मिळणार ही शक्यता केवळ शक्यताच आजवर राहिली होती. अमर काळे यांनी लोकसभा लढविण्याचे संकेत दिले होते. पण इच्छुकांच्या नाराज्या आणि अधांतरी असलेले उमेदवारीचे आश्वासन या बाबी अस्वस्थ करणाऱ्या होत्या. पण आता अमर काळे यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार गट) प्रवेशानंतर उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले आहे. समाज माध्यमातून त्यांच्यावर शुभेच्छाचा देखील वर्षाव झाला आहे. माजी आमदार अमर काळे मूळचे आर्वी येथील आहेत. वडील शरद काळे हे सलग चारदा विधानसभेत निवडून गेले. 1985 मध्ये श्रीधरराव ठाकरे यांचा पराभव करीत 44 टक्के मते घेत विजय मिळविला होता. 1990 मध्ये ज्योती विजय खोंडे यांच्या विरोधात 36 टक्के मतदान घेत विजयी झाले होते. 1995 मध्ये दिलीप नारायणराव काळे यांच्या विरुद्ध 39 टक्के मतदान त्यांनी मिळविले. तर 1999 मध्ये विजयराव मुळे यांच्या विरुद्ध शरद काळे 40 टक्के मताधिक्य घेत विजयी झाले होते. आपल्या राजकीय कारकिर्दीत त्यांना जेवढी कार्यकर्त्यांची साथ मिळाली तेवढीच साथ त्यांच्या पत्नी म्हणजेच माजी आमदार अमर काळे यांच्या आई अनुराधा ताई शरदराव काळे यांची साथ मिळाली. राजकारणात पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिलेल्या अनुराधा ताई यांनी सतत शरदराव काळे यांना साथ दिली. अमर काळे यांना राजकीय वारसा घरून मिळाला पण तेवढाच त्यांनी तो टिकवून ठेवण्यासाठी धडपड देखील केली असे त्यांचे जुने सहकारी सांगतात.
दूर होताहेत नाराज्या :
उमेदवारी मिळविण्यात जवळपास यश आले आहे. आपल्या उमेदवारीला विरोध दर्शविणाऱ्यांच्या नाराज्या दूर करण्यात देखील त्यांना यश आले असल्याचे चित्र सध्या सिल्व्हर ओक वरील छायाचित्रातून स्पष्ट होत आहे. अमर काळे यांच्या पक्ष प्रवेश कार्यक्रमात सुनील राऊत, नितेश कराळे, माजी आमदार राजू तिमांडे, सुधीर कोठारी, अतुल वादीले, सुरेश देशमुख हे स्थानिक नेते उपस्थित होते. त्यामुळे महाविकास आघाडीने कंबर कसली असल्याचे चित्र आहे.

दोन एप्रिल खास दिवस :
2 एप्रिल हा अमर काळे यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निवडलेला दिवस. अमर काळे यांनी हाच दिवस का निवडला? याचे उत्तर मात्र काळे यांच्या कार्यकर्त्यांच्या ओठी चांगलेच बसले आहे. 2 एप्रिल हा दिवस म्हणजे अमर काळे याच्या आई अनुराधाताई शरदराव काळे यांचा स्मृती दिवस. आईच्या स्मृती दिवसावर उमेदवारी अर्ज भरण्याचा योग येणे म्हणजे आईचा आशीर्वादच मिळविणे, असे अमर काळे समजतात. त्यामुळे अमर काळे यांनी या दिवसावर आपली उमेदवारी भरण्याची तयारी चालविली आहे.
दोन एप्रिल रोजी आपण उमेदवारी दाखल करणार असल्याचे अमर काळे यांनी।आधीच स्पष्ट केले होते तर राष्ट्रवादी काँग्रेस चे वर्धा जिल्हाध्यक्ष सुनील राऊत यांनी देखील दोन एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे सांगितले आहे.


