वर्ध्याच्या सेवाग्राम येथे सात दिवसांपासून अनोखे आंदोलन सुरू
सेवाग्राम विकास आराखड्यातून मूळ सेवाग्राम गावाचा विकास केला नाही
वर्धा : 244 कोटी रुपये खर्च करून सेवाग्राम विकास आराखडा राबविला जात आहे. सेवाग्राम येथे आश्रम परिसरात पायाभूत सुविधा आणि पर्यटनाच्या दृष्टीने विकास होत आहे, पण ज्या मूळ जुन्या गावात सेवाग्राम येथे महात्मा गांधी पहिल्यांदा आले त्या गावाचा विकास होत नाही. सेवाग्राम विकास आराखड्यात गावासाठी पैसे नसतील तर आपण आपले अवयव विकून निधी द्यायला तयार असल्याचा मचकूर पोस्टरवरून मांडत एका गावकऱ्याने सेवाग्राम आश्रमाच्या समोर बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. गेल्या सात दिवसापासून सुरू असलेल्या या आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

गावाच्या विकासासाठी निधी नसल्याचं कारण वरचेवर पुढे करण्यात आले. सेवाग्रामच्या मेडिकल चौक परिसरात स्ट्रीट लाईट नाही. शौचालयाची व्यवस्था नाही, मूळ गावात मूलभूत सुविधांचा अभाव आहे. कोट्यवधींचा विकास आराखडा राबविला जात असताना सेवाग्राम या जुन्या गावाच्या विकासाकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे सेवाग्राम येथील ज्ञानेश्वर अनकर यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले. सेवाग्राम आश्रम समोरच हे उपोषण सुरू केले आहे. गावकऱ्यांनी आंदोलनातून गावाच्या विकासासाठी आपले अवयवच विकायला काढण्याची तयारी दर्शविली आहे. कित्येक दिवसापासून स्ट्रीट लाईट बंद आहे, मूळ गावाचा विकास होत नाही, आणि सेवाग्राम विकास आराखड्यामध्ये मूळ गावाचा विकास समाविष्ट झाला नाही, त्यामुळे गावाचा विकास रखडला अशीच प्रतिक्रिया ज्ञानेश्वर अनकर यांनी दिली. अनेकदा प्रशासनाकडून गावाच्या विकासासाठी निधी नाही असं कारण वारंवार सांगितल्याने ज्ञानेश्वर यांनी आंदोलनात माझ्या शरीराची अवयव विका आणि गावाचा विकास करा! असे आव्हानात्मक बॅनर आंदोलनाच्या ठिकाणी लावले आहे. अनेकदा वारंवार निवेदन दिली गेली प्रशासनाला अजून पर्यंत गावाचा विकास केला नसल्याची ओरड आता गावकऱ्यांकडून केली जात आहे.


