वर्ध्याच्या देवळी येथे शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी लोटांगण
तब्बल दीड किलोमीटर लोटांगण घालत केले आंदोलन
देवळीत युवा संघर्ष मोर्चाचे लोटांगण आंदोलन
वर्धा : वर्धा जिल्ह्यातील देवळी येथे शेतकऱ्यांनी दीड किलो मीटर अंतरापर्यंतचे लोटांगण आंदोलन केले आहे. वर्धा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीनंतर ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा यासह विविध मागण्या या आंदोलनातून करण्यात आल्या आहे. देवळी शहराच्या बसस्टॉपपासून ते तहसील कार्यालयापर्यंत लोटांगण घेत हे आंदोलनकर्ते तहसील कार्यालय येथे पोहचले आहे.
वर्धा जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा,शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, पांधन रस्ते तयार करावे या मागणीसाठी हे लोटांगण आंदोलन आहे. युवा संघर्ष मोर्चाचे अध्यक्ष किरण ठाकरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होत आहे. शेतकऱ्यांसाठी केलेल्या या आगळ्यावेगळ्या आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
देवळी तालुक्यातील शेतकरी युवा संघर्ष मोर्चाच्या बॅनर खाली एकत्र आले. संघटनेचे अध्यक्ष किरण ठाकरे यांनी देवळी येथील बस स्थानक चौकातून लोटांगण आंदोलनाला सुरुवात केली. त्याच्यासोबत त्याचे सहकारी देखील या आंदोलनात सहभागी झाले.मनोज नागपुरे, राजेंद्र तायवाडे या दोन शेतकऱ्यांनी देखील लोटांगण घेतले.
बसस्थानक चौक परिसरातून लोटांगण घेत निघालेल्या शेतकऱ्यांनी देवळी शहरातील विविध चौक मार्गे तब्बल सव्वा किलोमीटर अंतर लोटांगण घेत पार केले आहे. लोटांगण घेत हे शेतकरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे तहसील कार्यालय येथे पोहचले याठिकाणी तहसील प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. ओला दुष्काळ जाहीर करावा, अतिवृष्टी झालेल्या शेतात पंचनामे पूर्ण करावे, पीक विमा द्यावा, शेतकऱ्यांना अनुदान देऊन आर्थिक मदत द्यावी, हमीभाव देऊन सहकार्य करावे अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या आहे.
Post Views: 250


