वर्धा – बारा तास वीज मिळावी यासाठी शेतकरी सतत प्रयत्न करीत असताना वर्धा जिल्ह्यात मात्र अजूनही दिवसा शेतकऱ्यांना वीज मिळणे कठीण झाले आहे. दिवसाची बारा तास वीज मिळण्यापासून शेतकरी वंचित असताना वर्ध्याचे पालकमंत्री, तथा ऊर्जामंत्री नेमके करतात तरी काय? असाच सवाल माजी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तानपुरे यांनी केला आहे. वर्ध्याच्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ राष्ट्रवादी काँग्रेसने शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी त्यांनी भाजप सरकारवर टीका केली आहे.

वर्धा जिल्ह्यात अतिवृष्टी झाली त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसाणीमुळे शेतकऱ्यांकडून विजेची बिले देखील भरणे शक्य झाली नाही. शेतकऱ्यांचे वीज बिल माफ झाले पाहिजे, जिल्ह्यात शेतकऱ्यांना 12 तास वीज उपलब्ध व्हावी अशाच मागण्या यावेळी धरणे आंदोलनातून राष्ट्रवादी कॉंग्रेस कडून करण्यात आल्या आहे. सोमवारी सकाळपासून राष्ट्रवादी काँग्रेसने वर्ध्यात धरणे आंदोलन सुरू केले आहे.
12 तास वीज काही जिल्ह्यात उपलब्ध करून देण्यात आली. परंतु जंगलाने व्यापलेला वर्धा जिल्हा मात्र त्यातून वगळण्यात आले आहे. रात्रीला शेतात पिकांना पाणी देताना बऱ्याचदा जंगली श्वपदांचे हल्ले होतात. कारंजा तालुक्यात अशा घटना घडल्या. मनुष्यहानी देखील झाली आहे. बिल न भरल्याने शेतकऱयांच्या वीज जोडण्या तोडण्याचे आदेश काढण्यात आले आहे. वर्धा जिल्ह्यातील भाजपच्या आमदारांना आता हे दिसत नाही काय? असा प्रश्न या आंदोलनात उपस्थित करण्यात आला आहे. यावेळी धरणे आंदोलनात राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार सुरेश देशमुख, अतुल वांदीले, माजी आमदार राजू तिमांडे, सुनील राऊत आदी सहभागी झाले होते.


