तुळजापूरच्या शाळकरी विद्यार्थ्यांचा सवाल
जलद गाड्यांना थांबा देण्याची चार वर्षांपासून होतेय मागणी
साखळी उपोषणात शाळकरी विद्यार्थी देखील झाले सहभागी
(आशिष इझनकर)
वर्धा : जपानला एका विद्यार्थ्यासाठी ट्रेन थांबते, मग आमच्या गावातील शेकडो विद्यार्थ्यांसाठी ट्रेन का थांबत नाही? असा सवाल शाळकरी विद्यार्थ्यांनी उपोषण मंडपात उपस्थित केला. दळणवळणाच्या मुबलक साधनापासून दूर असलेल्या आमच्या गावात किमान जलद ट्रेन तरी थांबावी अशी रास्त अपेक्षा बाळगून विद्यार्थ्यांनी साखळी उपोषणात सहभाग नोंदविला आहे. शाळकरी विद्यार्थ्यांच्या मोठ्या संख्येमुळे रेल्वे थांब्यासाठी चाललेल्या उपोषणाच्या साखळीकडे लक्ष वेधले गेले आहे.
वर्ध्याच्या सेलू तालुक्यात येणाऱ्या तुळजापूर (दहेगाव) येथे जलद गाड्यांना थांबा मिळावा यासाठी नागरिक विदर्भ राज्य आघाडीच्या नेतृत्वात साखळी उपोषणाला बसले आहे. शिक्षणासाठी दहेगाव येथून बाहेरगावी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रेल्वे थांबा अत्यावश्यक असल्याने शाळकरी विद्यार्थी देखील मोठ्या संख्येत या आंदोलनात सहभागी झाले आहे. 27 जानेवारी पासून हे उपोषण सुरू असून शाळकरी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येत या आंदोलनात सहभागी होऊन आपल्या मागणीकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
नागपूर – वर्धा रेल्वे लाईनवर सिंदी रेल्वे जवळ तुळजापूर(दहेगाव) हे मोठे गाव आहे. सुमारे 25 छोटीमोठी गावे येथील रेल्वे स्थानकाशी जुळून आहे. दळनवळणाचे प्रमुख साधन येथे रेल्वे हेच आहे. येथे कित्येक वर्षापासून जलद गाड्यांना थांबा देण्यात आला होता. परंतु कोरोना काळ आला आणि रेल्वे मंत्रालयाने आणि अधिकाऱ्यांनी हा थांबा बंद केला. केंद्र शासनाच्या अखत्यारीत येत असल्याने येथील नागरिकांनी खासदार रामदास तडस यांना अनेकदा निवेदने दिली. याशिवाय रेल्वे प्रशासनाला देखील निवेदने देत विनंत्या करण्यात आल्या आहे. अलीकडेच काही दिवसांपूर्वी येथे रेल्वे रोको आंदोलन करून नागरिकांनी मागणीकडे लक्ष वेधले होते. परंतु प्रत्येकवेळी आंदोलन केल्यावर केवळ आश्वासन देण्यात आले पण त्यावर तोडगा मात्र निघाला नाही.
चार वर्षांपासून ही मागणी होत असताना प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. 27 जानेवारी पासून नागरिकांनी विदर्भ राज्य आघाडीच्या नेतृत्वाखाली
तुळजापूर रेल्वे स्थानकाच्या बाहेर हे साखळी उपोषण सुरू केले आहे. तुळजापूर (दहेगाव) येथे गेल्या चार वर्षांपासून जलद गाड्या थांबणे बंद झाले आहे. कोरोना काळाच्या पूर्वी इंटरसिटी एक्स्प्रेस, जबलपूर एक्स्प्रेस, विदर्भ एक्स्प्रेस आणि मेल या गाड्या तुळजापूर (दहेगाव) येथे थांबत होत्या. कोरोना नंतर मात्र या गाड्यांचे थांबे बंद झाले. हे थांबे पूर्ववत सुरू करावे अशी मागणी गावकऱ्यांनी या साखळी उपोषणातून केली आहे. तुळजापूर या गावाच्या सभोवताल 25 गावे आहेत. या सर्व गावातील नागरिक, कामगार, नोकरदार आणि शाळकरी विद्यार्थ्यांना रेल्वे हा एकमेव पर्याय उपलब्ध आहे. असे असताना गेल्या चार वर्षांपासून येथील नागरिक जलद गाड्यांचा रेल्वे थांबा मागत आहे.




