भागवत सप्ताहातून समाज प्रबोधन
व्यसनाधीनता रोखण्यासाठी गावागावात जागृती
गुरुशिष्य परंपरेला जपण्याचा गुल्हाने परिवाराने घेतला ध्यास
आत्महत्येपेक्षा अध्यात्मातून आत्मशुद्धी महत्वाची – हभप खोडे महाराज
वर्धा : आम्ही गावा गावात भागवत कथा करतो, भागवतामधून समाज प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला जातो. व्यसनाधीनतेमुळे गावात आत्महत्या होण्याचे प्रमाण वाढले आहे, यासाठी प्रबोधन हा महत्वाचा मार्ग आहे. आम्ही अनेकांना भागवत सप्ताहात येण्याचे आवाहन करतो, भागवत सप्ताहात श्रवण केलेल्या ज्ञानातून युवक व्यसना सारख्या दुर्धर आजारापासून परावृत्त होत आहे. आत्महत्या करून जीवन संपविण्यापेक्षा आत्मशुद्धी करून विचारात परिवर्तन करण्याची गरज आहे, तेच आम्ही भागवत सप्ताहाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करीत आहोत. यात महेश गुल्हाने यांच्यासारख्या समाजसेवकाचा देखील सिहाचा वाटा आहे. या कृष्ण धाम येथून विविध उपक्रमातून समाजात पोहचणारा संदेश हा समाज परिवर्तन घडविणारा ठरणार आहे अशी अपेक्षा हभप रामेश्वर जी खोडे महाराज यांनी यावेळी व्यक्त केली.

अध्यात्म ही जीवन सफल करणारी आयुष्याची सर्वात मोठी गुरुकिल्ली आहे. शिक्षणाने माणूस मोठा होतो पण शहाणा होत नाही, शिक्षणाला जर संस्काराची जोड मिळाली तर मानवी आयुष्य सफल होते असा विचार हरिभक्त पारायण श्री रामेश्वर खोडे महाराज यांनी मांडला. समाजसेवक महेश गुल्हाने यांनी धोत्रा रेल्वे येथील कृष्णगिरी धाम येथे सदगुरू परमहंस कृष्णगिरी महाराजांच्या वार्षिक पुण्यतिथी निमित्ताने संगीतमय भागवत कथा आयोजित केली आहे. दरवर्षी स्वर्गीय शंकरबाबा गुल्हाने आणि स्वर्गीय विमलआई शंकरराव गुल्हाने यांच्या पावन स्मृती प्रित्यर्थ या कथेचे आयोजन करण्यात येते. व्यसनमुक्ती प्रचारक हभप रामेश्वरजी खोडे महाराज आणि समाजसेवक महेश गुल्हाने यांनी या सप्ताहाबाबत माहिती देण्याकरिता पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. सात दिवस चालणाऱ्या विविध कार्यक्रमाची माहिती यावेळी देण्यात आली. 5 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी दरम्यान हा सप्ताह सोहळा पार पडणार आहे. 12 फेब्रुवारी रोजी रथयात्रा व दिंडी सोहळा टाळ व ढोल ताशांच्या गजरात आयोजित करण्यात आला आहे.

कृष्णगिरी धाम येथे दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. आरोग्य तपासणी शिबीर, नेत्र तपासणी शिबीर आणि रक्तदान शिबिर यासारखे उपक्रम येथे राबविले जातात. तसेच सामूहिक विवाह सोहळ्यात शेतकरी, शेतमजूर व गरजू कुटुंबातील युवकांचा शुभविवाह पार पाडण्यात मदत केली जाते. सेवा हाच आपला धर्म असल्याचे सांगत यावेळी महेश गुल्हाने यांनी येथील उपक्रमाची माहिती दिली. याच ठिकाणी गोशाळा देखील उभारण्यात आली आहे.



