26 दिवसाच्या उपोषणातून 25 गावांचा प्रश्न सुटला
विदर्भ राज्य आघाडीकडून करण्यात आले उपोषण
विद्यार्थी आणि गावकऱ्यांनी दिला होता उपोषणाला पाठिंबा
अखेर रेल्वे प्रशासनाला उपोषण आंदोलनाची घ्यावी लागली दखल
रेल्वे थांब्यासाठी पाच वर्षापासून करण्यात आली विविध आंदोलने
खासदार रामदास तडस यांनी ज्यूस पाजून सोडविले उपोषण
आशिष इझनकर वर्धा : वर्ध्याच्या सेलू तालुक्यात येणाऱ्या तुळजापूर (दहेगाव) येथे जलद गाड्यांना थांबा मिळावा यासाठी नागरिक विदर्भ राज्य आघाडीच्या नेतृत्वात साखळी उपोषणाला बसले होते. शिक्षणासाठी दहेगाव येथून बाहेरगावी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रेल्वे थांबा अत्यावश्यक असल्याने शाळकरी विद्यार्थी देखील मोठ्या संख्येत या आंदोलनात सहभागी झाले. 27 जानेवारी पासून हे उपोषण सुरू करण्यात आले. शाळकरी विद्यार्थ्यांसह गावकऱ्यांनी विदर्भ राज्य आघाडीच्या हाकेला ओ देत पुढाकार घेतला. 26 दिवसाच्या उपोषण आंदोलनानंतर 25 गावांच्या प्रवासाचा प्रश्न मार्गी लागला आहे. अखेर रामकीशन सिंघमधुपे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या उपोषण आंदोलनाला यश आले आणि तुळजापूर (दहेगाव) येथे इंटरसिटी या गाडीला थांबा मिळाला आहे. मागण्या मान्य झाल्याने खासदार रामदास तडस यांनी भेट देऊन रामकीशन सिंघमधुपे यांना ज्यूस पाजत उपोषण सोडविले आहे. विद्यार्थी आणि गावकऱ्यांनी विदर्भ राज्य आंदोलनाच्या पुढाकारासाठी रामकीशन सिंघमधुपे यांचे आभार मानले आहे.



