वर्धा – पिंकाना उध्वस्त करणाऱ्या जवळपास पन्नास जंगली रानडुक्करांच्या कळपातील नऊ रानडुक्कर पळता-पळता शेतातील विहिरीत पडले. ही घटना सोमवारी सकाळच्या सुमारास सेलू तालुक्यातील केळझर परिसरात समोर आली. सदर रानडुक्करांना वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने रेस्क्यू करीत सुखरूप विहिरीच्या बाहेर काढत त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे.

जंगली श्वापदे शेतकऱ्यांच्या शेतातील उभी पिके उध्वस्त करीत असून त्यांच्या हैदोसामुळे शेतकरी मेटाकुटीस आले आहे. वन्यप्राण्यांच्या हैदोसामुळे उध्वस्त होणाऱ्या पिकांना वाचवण्यासाठी शेतकरी रात्रभर जागली देखील करतात. परंतु वन्यप्राण्यांचे झुंडच्या झुंड शेतपिकांचे नुकसान करीत असून शेतकरी हतबल झाले आहेत. केळझर शिवारात सुदाम घवघवे यांची शेती आहे. जंगली रानडुक्करांनी त्यांच्यासह इतर शेतकऱ्यांच्या शेतातील भेंडी, वांगी, कपाशी, तूर आदि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले असून शेतकऱ्यांनी मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे.
सोमवारी त्यांच्या शेतातील विहिरीत पन्नास रानडुक्करांच्या कळपातील नऊ रानडुक्कर पळता-पळता पडले. सदर बाब उघडकीस येताच वनविभागाला माहिती देण्यात आली. यावेळी हिंगणी येथील वनपरिक्षेत्र अधिकारी अक्षय आगाशे यांच्या मार्गदर्शनात सेलू येथील क्षेत्र सहाय्यक दिनेश उईके, केळझर क्षेत्र सहाय्यक निलेश मुन, वनरक्षक जी एम मोहर्ले, गोविंद चंद्रवंशी, गणेश मडावी, सुरज जोगे, मारोती नेहारे, दिलीप पारसे यांनी घटनास्थळी भेट देऊन विहिरीत पडलेल्या रानडुक्करांना रेस्क्यू करण्यासाठी प्रयत्न केले. यावेळी स्थानिक नागरिक लखनसिंग बावरी, भोलासिंग बावरी, दिपकसिंग बावरी, सुरजितसिंग बावरी यांच्या मदतीने विहिरीत अडकलेल्या रानडुक्करांना सुखरूप विहिरीच्या बाहेर काढण्यात आले. जवळपास दोन तासांच्या परिश्रमानंतर सगळे रानडुक्कर विहिरी बाहेर काढण्यात आले. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना परत त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडले.


