वर्धा : शेतकऱ्यांचा शेतमाल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात भिजतो. ही नेहमीची समस्या सोडविण्यासाठी शेड देखील उभारण्यात आले. पण व्यापारी, दलाल आणि प्रशासकीय अतिक्रमनाने शेड देखील कमी पडू लागले आहे. सातत्याने शेतकऱ्यांसाठीचे शेड शेतकऱ्यांनाच मिळत नसल्याने बाजाराच्या यार्डातील शेती पिकावर अवकाळीचे संकट घोंगावत आहे.
वर्ध्यासह विदर्भात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला होता. काही ठिकाणी पाऊस देखील झाला. शेतकऱ्यांचा शेतातील शेतमाल वाचविण्याच्या सूचना आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आल्या. तर काही शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतपिकाची काळजी आधीच घेतलेली होती. पण शेतातील शेतीपिक हातून जाईल अशी भीती शेतकऱ्यांना आहेच. याशिवाय कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात आणलेल्या शेतमालाची देखील चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. वर्षभर कष्ट करून पिकवलेल्या शेतपिकावर अवकाळी पाऊस नेहमीच पाणी फिरवत आला आहे. पण शेतकऱ्यांचा शेतमाल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नेहमीच उघड्यावर का राहतो ? असाच प्रश्न नेहमी शेतकरी विचारतात. विविध योजनांच्या निधीमधून हिंगणघाट, वर्धा, सेलू, देवळी, आर्वी आणि समुद्रपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठे शेड उभारण्यात आले आहे. विक्रीसाठी आलेला शेतकऱ्यांचा शेतमाल हा या शेडखाली रहावा असाच या योजनेतील शेडचा उद्देश आहे. परंतु दरवर्षी व्यापारी आणि दलालांकडून या उद्देशाला हरताळ फासला जातो. शेडमध्ये शेतकऱ्यांचा नाही तर व्यापाऱ्यांचा माल ठेवण्यात येतो. पाऊस आला की मग मात्र धावपळ होते. शेतकरी शेतमाल ठेवण्यासाठी बाजारातील शेडमध्ये जागाही शोधण्याचा प्रयत्न करतो. पण व्यापाऱ्यांच्या अतिक्रमणाने हिरावलेली जागा शेतकऱ्याला मिळणे कठीण जाते आणि बऱ्याचदा शेतकऱ्याला आपला माल ओलाचिंब होताना पाहावे लागते.

बाजार समितीमध्ये आवक वाढली की व्यापाऱ्यांची देखील तारांबळ होते. पण यासाठी आधीच खरेदी करण्यात आलेला माल लवकरात लवकर उचल करण्यासाठीची सुविधा व्यापाऱ्यांकडून होणे आवश्यक आहे. पण ते होताना दिसत नाही. त्यामुळेच बाजारात मोठ्या प्रमाणात आवक झाली तर शेतमाल यार्डात भरगच्च भरलेला असल्याने तो माल उचले पर्यत बाजार समितीमध्ये व्यवहार देखील ठप्प राहतो. ‘उद्या खरेदी बंद’ अशा सूचना लावल्या जातात. बऱ्याचदा आठवड्यातून एक-दोन दिवस बाजार समितीच्या आवारात लिलाव होत नाही.
याकडे शेतकऱ्यांनी बाजार समिती प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला तरी मात्र डोळेझाक केली जाते. बाजारात भाव वाढत असताना अचानक एक – दोन दिवस बाजार बंद राहिल्याने शेतकऱ्यांना नक्कीच फरक पडतो. चार दिवसावर गेलीली खरेदी योग्य भाव देऊ शकत नाही असाही शेतकऱ्यांचा अनुभव आहे.
विदर्भात ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. 15 ते 18 मार्च यादरम्यान अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. काही ठिकाणी या पावसाने शेतमाल देखील भिजला. यार्डात आलेला माल घरी परत कसा न्यायचा या विवंचनेत शेतकरी नेहमी असतो. यावेळी देखील तेच झाले. त्यामुळेच वर्ध्यात वर्धा बाजार समिती प्रशासनाने गुरुवार पासून सोमवार पर्यत कृषी उत्पन्न बाजार समिती मधील लिलाव प्रक्रिया बंद ठेवली आहे.
शेतकरी संघटनेचे सचिन डाफे म्हणतात,
‘ही समस्या वर्ध्याच्या सर्वच बाजार समितीमध्ये पाहायला मिळते. व्यापाऱ्यांचे वर्चस्व जास्त आहे त्यामुळे सामान्य शेतकरी जागा तरी कशी मागणार असा प्रश्न आहे. बऱ्याचदा शेतकऱ्यांचा हिरमोड होतो. व्यापारी मालाची उचल लवकर करीत नाही त्यामुळे लिलाव देखील बंद राहतात.’
वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव समीर पेंडके म्हणतात, ‘चार दिवसाचा अवकाळी पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे गुरुवार पासून लिलाव बंद ठेवण्यात आले आहे. सकाळी भाजी बाजार सुरू राहतो पण धण्याचा बाजार बंद ठेवण्यात आला आहे.’


