विकासकामे होतच राहील, दिव्यांगांसाठी काही करायची इच्छा होती
आमदार रणजित कांबळे यांचे प्रतिपादन
वर्धा (ब्युरो) : दिव्यांगाना येजा करण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. काहीकडे साधन नाहीय तर काहीनी तीनचाकी सायकल घेतल्या तर काही दिव्यांग बांधव हे पेट्रोलवर चालणाऱ्या गाडीने प्रवास करतातं. पेट्रेल गाड्यांचा खर्च त्यांना परवडत नाहीय. माझ्याकडे अनेक दिव्यांग बांधवांनी वाहनाची मागणी केलीय. त्यामुळे मी स्वत: मला जिल्हा खनिज विकास निधीतून प्राप्त झालेले १० लाख रुपये दिव्यांग बांधवांसाठी खर्च करण्याचं ठरवलं. त्या निधीतून दिव्यांग लाभार्थ्यांकरिता १० तीनचाकी ई-स्कूटर खरेदी केल्या. विकासकामांसाठी निधी मिळणारच आहे, विकासकामे हे नेहमीच होणार आहे. पण, दिव्यांगांसाठी काही करायची इच्छा होती, त्यामुळे दिव्यांगांसाठी ई-स्कूटर खरेदी केल्या. आणखी गरज पडल्यास पुन्हा उपलब्ध करुन देण्यात येईल, असे प्रतिपादन आमदार रणजित कांबळे यांनी केले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजना जिल्हा खनिज प्रतिष्ठान अंतर्गत ‘वरिष्ठ नागरिक व विकलांग व्यक्तींचे कल्याण’ अंतर्गत देवळी मतदार संघातील दिव्यांग बांधवांना ई-स्कूटर वितरण कार्यक्रम वर्धा येथील पंचायत समिती सभागृहात पार पडला. यावेळी ते बोलत होते.



